|
|
नामदेवाजवळ जन्मत:च परमात्माशक्ती होती; त्यामुळे तो अगदी लहान वयातच मोठया भक्तांसारखा परमेश्वराची भक्ती करु लागला होता. घरच्या कामात तो अजिबात लक्ष घालीत नव्हता. सदान कदा नामस्मरणात मग्न किंवा मंदिरात जाऊन बसणं हाच त्याचा एक ध्यास होता. दामाजी, गोणाईसुध्दा भक्ती करीत होते; पण त्यांना आपल्या प्रपंचाचीही काळजी होती.
त्याच्या वयाची इतर मुले आईवडिलांना मदत करीत असत. तशीच मदत नामदेवानेही आपल्याला करावी, असे दामाजी-गोणाईला वाटत असे. त्यांनी तसे अनेक वेळा कधी गोडीने, कधी समजावून सांगून, कधी थोडा दम देऊन, तर कधी दुसऱ्यांची उदाहरणे देऊन सांगण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचे घरात लक्षच लागेना. उलट विठ्ठलभक्ती जास्त जास्त वाढतच चालली. शेवटी दामाजीला वाटले, याचे लग्न केल्याशिवाय स्वारी ताळ्यावर येणार नाही.
दामाजीन गोणाईला आपला विचार सांगितला. तिचा होकार मिळाला. उलट तिला सून येणार म्हणून आनंदच झाला. नामदेव बारा - तेरा वर्षाचा होता. पण त्या काळात अशा लहान वयातच मुलांची लग्ने होत असत. नामदेव तर प्रकृतीने उत्तम होता. दिसायला छान होता. स्वभाने चांगला होता. त्याचे बोलणे मधुर होते. त्याच्या लग्नाचा विचार कळायचा अवकाश, की दामाजीचे ओळखीचे अनेक मित्र आपली मुलगी करा, म्हणून विनंती करु लागले.
पंढरपूरातच गोविंदराव सदावर्ते नावाचे गृहस्थ रहात होते. त्यांची मुलगी राजाई. मोठी गोड मुलगी. दिसायला चांगली चुणचुणीत होती. दामाजी-गोणाईलाही मुलगी पसंत पडली. ती आठ वर्षाची होती. नामदेव -राजाईचे लग्न झाले; ती सासरी आली. गोविंदराव सदावर्तेंना चांगला जावई मिळाल्याचा व पोर उत्तम घरात पडल्याचा आनंद झाला.
लग्न झाले पण नामदेवाच्या वागण्यात सुधारणा कुठे! त्याची बैठक दिवसभर विठ्ठल मंदिरातच. सगळा वेळ देवाची सेवा आणि नामस्मरण यातच जात असे. कधी कधी तो राजाईलाही बरोबर मंदिरात नेत असे. तिच्या माहेरीसुध्दा विठ्ठालभक्ती होतीच: त्यामुळे तिलाही बरे वाटायचे.
लग्न झाले; तरी घरात लक्ष नाही. दुकानाच्या व्यवहारात लक्ष नाही. कोणाची विचारपूस नाही, की काही आण-सवर नाही. लग्नानंतर काही जबाबदारी आपल्यावर आहे, याचेही नामदेवाला भान नव्हते. त्याच्यालेखी तिन्ही त्रिकाळ फ़क्त एकच विठ्ठल.... विठ्ठल.... विठ्ठल !
दामाशेटी आणि गोणाईने त्याला त्याच्या जबाबदारीची जाणीव करुन देण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला; पण त्यांचे हे सांगणे त्यांच्या कानात शिरतच नव्हते. अन शिरलेच तरी दुसऱ्या कानाने लगेच बाहेर पडत होते. नामदेवाच्या कानात विठ्ठल, डोळ्यात विठ्ठल, जिभेवर विठ्ठल, विठ्ठलाच्या नामपुढे, भक्तीपुढे त्याला तहानभूकसुध्दा लागत नसे.
|
|