|
|
श्री विट्ठलभक्ती आणि पंढरपूरची वारी यांची परंपरा असलेले रेळेकर कुटुंब होते. हे कुटुंब महाराष्ट्राच्या मराठवाडा विभागात परभणी जिल्ह्यातील नरसी बामणी नावाच्या गावात रहात होते. यदुनाथशेटी हे या घराण्याचे मूळ पुरुष. ते स्वत: विठ्ठलाची भक्ती करायचे आणि दर वर्षी आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरला जायचे. पुढे हीच परंपरा त्यांचा मुलगा हरी व त्याचा मुलगा गोपाळशेट व त्याची पत्नी गंगाबाई यांनी पुढे चालविली.
पुढे या घराण्याच्या प्रत्येक पिढीच्या प्रत्येक सदस्याने हा वारसा उत्तम प्रकारे स्वीकारला, जतन केला, चालविला आणि पुढच्या पिढीच्या हाती सोपविली. या भक्तीच्या जोपासण्यामुळे संपूर्ण घराण्यात, संपूर्ण घरातच एक प्रकारचे भक्तीचे धुंद वातावरण निर्माण झालेले असायचे.
गोपाळशेटींना गोविंदशेटी व रघुशेटी ही दोन मुले होती. हरीचा विवाह बायजाबाई नावाच्या मुलीबरोबर झाला. यांचे वडील यदुशेटी हे नरसीबामणी गावात कापड विणण्याचा व्यवसाय करीत असत. ते पांडूरंगाचे निस्सीम भक्त होते. तसेच ते एकवचनी होते. त्यांची पत्नी ही धार्मिक वॄत्तीची- पतीच्या धार्मिक भावनेत गुंतून संसार-प्रपंच करणारी होती. आपले पती यदुशेटी यांना चांगली साथ देत होती.
हरीशेटी हे सुध्दा आपल्या वडिलांसारखेच धार्मिक प्रवॄत्तीचे होते. त्यांची बायको बायजाबाई ही धार्मिक वॄत्तीची होती. हरीशेटी नेहमी लोकांना पंढरपूरची वारी करण्यासाठी जाताना पहात. आल्या-गेल्या लोकांकडून पंढरपूरच्या सोहळ्याची, पांडुरंगाच्या दर्शनाने मिळणाऱ्या आत्मिक समाधानाची, आनंदाची माहिती ते एकत असत.
त्यामुळे त्यांच्याही मनात उत्सुकता निर्माण होऊन, पंढरपूरला जाण्याविषयीची ऒढ वाटू लागली. आपल्या मनात निर्माण झालेल्या इच्छेप्रमाणे त्यांनी पंढरपूरला जाऊन श्री विठ्ठालाचे दर्शन घेण्याचे निश्चित केले. ते पंढरपूरला गेले. तो सोहळा 'याची देही याची डोळा' अनुभवला आणि पांडुरंगाचे ते सावळे सुंदर मनोहर रुप पाहिले. त्यांचे मन अत्यानंदाने भरुन गेले. नव्हे, नव्हे त्यांना ब्रम्हानंद झाला. येथून हलूच नये, असे वाटू लागले. त्यामुळे ते जरी परत नरसीबामणी या आपल्या गावच्या घरी परत आले तरी त्यांच्या डोळ्यांपुढून सोहळ्याचे ते रम्य दॄष्य आणि पांडुरंगाचे अनुपम्य दर्शन हलतच नव्हते. त्यानंतर त्यांनी आषाढी - कार्तिकीच्या वारीस पंढरपूरला जाण्यास नेम कधी चुकू दिला नाही.
काही दिवसांनी हरिशेटींचे वडील यदुशेटी व त्यांची पत्नी हे दोघेही मॄत्यू पावले. त्यानंतर हरिशेटी व बायजाबाई यांना मुलगा झाला. त्याचे नाव गोपाळशेटी असे ठेवण्यात आले.
गोपाळशेटी मोठा झाल्यावर त्याचे लग्न गंगाबाई नावाच्या मुलीबरोबर करण्यात आले. गोपाळच्या लग्नानंतर थोडयाच दिवसांत त्याची आई बायजाबाई-सर्वांना सोडून गेली. त्यामुळे हरिशेटीच्या मनात विरक्तीची भावना निर्माण झाली. मग त्यांनी आपला व्यापार-व्यवसाय आपला मुलगा गोपाळ याच्या हाती सोपविला आणि आपला दिवसाचा सगळा वेळ पूजाअर्चा, भजन आणि नामस्मरणात घालविण्यास सुरुवात केली. गोपाळशेटींची मुळ प्रवृत्ती ही व्यापाऱ्याचीच होती. त्यामुळे त्याने आपल्या धंदा- व्यवसायात थोडया दिवसांतच चांगला जाम बसविला व त्यामुळे त्याचा व्यापार मात्र चांगला वाढू लागला.
पुढे आणखी दोन वर्षे गेली व त्यानंतर त्याला गोविंदशेटी व रघुशेटी अशी दोन मुले झाली. आता हरिशेटींचे वय झाले होते. वार्धक्याने त्यांच्यावर अधिकार जमविला होता. असे असले तरी त्यांनी आपल्या दरवर्षीच्या पंढरीच्या वारीमध्ये कधी खंड पडू दिला नाही; पण आता त्यांना काळजी वाटत होती, की आपल्या घराण्यात वंशपरंपरेने चालत आलेली आपली पंढरपूरची वारी आपल्यानंतर कोण चालविणार ?
एके दिवशी हरिशेटींनी आपला मुलगा गोपाळ याला आपल्या जवळ बोलावून घेतले आणि त्याच्याजवळ आपल्या मनात असलेली पंढरपूरच्या वारीसंबंधीची रुखरुख बोलून दाखविली. तसे तो म्हणाला, " तुम्ही यासंबंधी काही काळजी करु नका. आपली ही एक जबाबदारी मी आनंदाने पार पाडीन. आपण आता म्हातारे झालात, थकलात; म्हणून या वर्षी तुम्हाला वारीला जाता येणार नाही., याच वर्षीपासून मी वारीला सुरुवात करतो."
आपला मुलगा गोपाळने असे आश्वासन दिल्यामुळे हरिशेटींचे मन निश्चिंत झाले. मनातील काळजी दूर झाली. मग ते मुलाला म्हणाले, मी जरी थकलो असलो तरी या वर्षी ही शेवटची वारी करुन येतो. यानंतर पुढच्या वारीला तू जा.' गोपाळने आपल्या वडिलांच्या इच्छेस मान दिला. त्याप्रमाणे हरिशेटी त्यावर्षी स्वत: पंढरपूरला गेले. तेथे गेल्यावर अतिशय भक्तिभावाने चंद्रभागात नदीत आंघोळ केली व पांडूरंगाचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात गेले. गाभाऱ्यात जाऊन त्यांनी श्री विठ्ठलचरणांवर आपले मस्तक ठेवले आणि श्री पांडुरंगाला विनंती केली,' हे देवा, मी आता म्हातारा झालो आहे. शरीर पार थकून गेले आहे. तेव्हा तुझ्या दर्शनासाठी इथे पंढरपुरला दरवर्षी येणे मला आता यापुढे जमणार नाही. म्हणून तुझ्या या पावन चरणावर मला ठाव दे. याच चरणावर मला चिरविश्रांती दे."
असे विनंती करुन ते चंद्रकलेसारखे सावळे, सुंदर रुप त्यांनी डोळे भरुन पाहिले. ह्र्दयात भरुन ठेवले आणि पांडुरंगचरणाला मिठी मारली. त्यानंतर हरिशेटी तेथून उठलेच नाहे. त्यांचा आत्मा पांडुरंगामध्ये सामावून गेला होता. हरिशेटींच्या अनन्यसाधारण भक्तिमुळेच साक्षात पांडुरंगाने त्यांना आपल्यात सामावून घेतले होते.
गोपाळशेटी याला आपल्या वडिलांचा पंढरपूर येथे पांडुरंगाच्या चरणांवरच मृत्यू झाल्याची बातमी त्या गावातील अन्या वारकऱ्याकडून कळली. त्याला फ़ार वाईट वाटले. पण मागे रहाणाऱ्या प्रत्येकालाच आपले पुढचे आयुष्य़ जगावे लागते; त्याप्रमाणे गोपाळशेटी थोडयाच दिवसानंतर परत आपल्या व्यापारधंद्यात लक्ष घालू लागला. हळूहळू तो वडिलांच्या मॄत्युचे दु:ख विसरला; पण आपण वडिलांच्या जिवंतपणी त्यांना त्यांच्या पश्चात आपण पंढरपूरची वारी करु, या दिलेल्या आश्वासनाचासुध्दा पूर्ण विसर पडला.
काही दिवसानंतर गोपाळशेटींची पत्नी गंगूबाईचे निधन झाले व पाठोपाठ काही दिवसांतच धाकटा मुलगा रघुशेटी यालाही मृत्युने कवटाळले. या अकस्मात झालेल्या आघाताने मग गोपाळला आपल्या वडिलांना दिलेल्या वचनाची आठवण झाली. या वेळी आपणास या वचनाचे विस्मरण झाल्याने आपली पंढरपूरची वारी चुकली, याबद्दल त्याला खूप पश्चाताप झाला. त्यानंतर मात्र दरवर्षी वारीला तो न चुकता पंढरपूरला जाऊ लागला.
त्याचा हा वारसा त्याने आपला मुलगा गोविंद याला दिला. घरच्या वातावरणामुळे गोविंद लहानपणापासूनच पांडुरंगाचा परमभक्त बनलेला होता. त्यामुळे तो आनंदाने दरवर्षी पंढरपूरच्या वारीची परंपरा पाळत होता. त्याचा संसार सुखाचा चालला होता. त्याला नरहर आणि जिवाजी अशी दोन मुले होती. मुले मोठी झाली. योग्य वयात त्यांची लग्ने झाली. नरहरच्या बायकोचे नाव लिंबाबाई असे होते; तर जिवाजीच्या बायकोचे नाव काशिबाई असे होते.
नरहर हा आपल्या वडिलांबरोबर लहानपणापासूनच कधी कधी पंढरपूरच्या वारीसाठी जात होता. त्यामुळे आषाढी एकादशीचा व कार्तिकी एकादशीचा पंढरपूर येथे होणारा सोहळा त्याने पाहिला होता. त्या वेळेपासूनच त्याच्या मनात पंढरपूरवारीची ऒढ व श्रीविठ्ठलाच्या दर्शनाची व्याकुळता भरलेली होती. वडिलांच्या पश्चात त्याच्या मनातील विठ्ठलभक्तीची गोडी आणखीनच वाढली; त्यामुळे पंढरपूरच्या वारीची परंपरा त्याने आनंदाने पुढे चालविली.
|
|