| |
संत
नामदेव महाराज यांची अभंगांची गाथा
|
|
|
|
| |
भाग
पहिला - मंगलाचरण अभंग |
| ८३. |
कोणी एके दिनीं श्रीकृष्ण अंगणी । विलोकी नयनीं प्रतिबिंब ॥१॥ मातेप्रती तेव्हां म्हणतसे हरी । काढोन झडकरी देई मज ॥२॥ माता म्हणे बाला न ये ते काढितां । आणीक अनंता माग कांही ॥३॥ ऐसें ऐकोनियां रडतसे हरी । त्यासी नानापरी समजावीत ॥४॥ बहुत खेळणीं पुढें ठेवी माता । परी तो रडतां न राहोचि ॥५॥ पालखीं नेऊनि हरीसी निजवीत । यशोदा ते जात स्वकार्यासी ॥६॥ तेच समयीं राधा आलीसे मंदिरीं । देखिला श्रीहरी रडतां तिनें ॥७॥ पालखीं जवळी जाऊनि सत्वर । घेत कडेवर हरीलागीं ॥८॥ राधा म्हणे कां तूं रडतोसी चाटा । गोष्टी त्या अचाटा सांगतोसी ॥९॥ ऐसें ऐकोनियां उगाची राहिला । खेळवी हरिला प्रेमें राधा ॥१०॥ मागुती नेऊनि पालखीं घातला । रडावा लागला हरी तेव्हां ॥११॥ राधेसी म्हणत यशोदा सुंदरी । यासी क्षणभरी नेई आतां ॥१२॥ आपुले मंदिरा घेऊन जाय यासी । ऐकोनि मानसीं संतोषली ॥१३॥ नामा म्हणे राधा घेऊन हरीसी । गेली मंदिरासी आपुलिया ॥१४॥
|
|
|
| |
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100 |
|