आद्य
`लोककवि' संत नामदेव
संत कवींच्या परंपरेत संत नामदेवाचे स्थान अनन्यसाधारण असेच आहे. 'नाचू
कीर्तनाचे रंगी । ज्ञानदीप लावू जगी ॥ असा संदेश देत भक्तीचा प्रसार
करीत नामदेव पार पंजाबपर्यंत पोचले. त्यांचा उल्लेख आद्य `लोककवि'
असाच केला जातो. कीर्तनाच्या माध्यमातून त्याने नामभक्तीचा प्रसार
केला. भगवद्भक्तीचे तत्त्वज्ञान ज्ञानेश्वरांनी प्राकृतात उपलब्ध
करुन दिले आणि या भक्ति तत्त्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करण्याचे
काम संत नामदेवाने केले.
प्राचीन मराठी संतकवींच्या परंपरेत संत नामदेवाचे स्थान अनन्यसाधारण
असेच आहे. संत ज्ञानेश्वरांनी भागवतसंप्रदायाचा पाया घालून भागवत
धर्माचे प्रवर्तन केले आणि संत नामदेवाने भगवद्भक्तीचा प्रसार केला.
म्हणून एकाअर्थी संत नामदेव हा भागवत धर्माचा प्रचारक मानला जातो.
साहित्य हे कालसापेक्ष असते. त्या त्या काळातील राजकीय, सामाजिक आणि
सांस्कृतिक परिस्थितीचे प्रतिबिंब साहित्यात उमटते. त्याचप्रमाणे साहित्यनिर्मितीच्या
प्रेरणा आणि प्रवृत्ती त्या त्या काळातील परिस्थितीतच असतात. तेराव्या
शतकात परचक्राच्या आक्रमणाची चाहूल लागली होती. समाज धार्मिकदृष्ट्या
विघटित झाला होता. परचक्रापासून समाजाचे संरक्षण व्हायचे असेल तर समाज
धार्मिक दृष्ट्या संघटित होणे आवश्यक होते. त्यासाठी भक्तीचे तत्त्वज्ञानच
आवश्यक होते.तत्त्वज्ञान संस्कृत भाषेत अडकलेले होते. म्हणून काळाची
गरज लक्षात घेऊन निवृत्तिनाथानी ज्ञानेश्वरांना ते तत्त्वज्ञान प्राकृत
भाषेत आणण्यास प्रवृत्त केले. ज्ञानेश्वरांनी व्यासादिकांचा मागोवा
घेत, त्यांना `वाट पुसत ' भगवद्गीतेचा भाष्यानुवाद केला. तीच `भावार्थदीपिका'
अथवा `ज्ञानेश्वराई' या ग्रंथनिर्मितीचे असे सामाजिक निर्वचन केले
जाते. भगवद्भक्तीचे तत्त्वज्ञान `ज्ञानेश्वरी'च्या रुपाने प्राकृतात
उप्लब्ध करुन दिले आणि संत ज्ञानेश्वरांनी समाधिस्थ हौऊन आपले कार्य
संपविले. त्या भक्तितत्त्वज्ञानाचा प्राकृतजनात प्रचार अन् प्रसार
तर झाला पाहिजे! ते अवघड कार्य संत नामदेवाने केले. तीही काळाची गरज
होती.
संत नामदेवाचा जन्म इ. स. १२७० मध्ये झाला. इ. स. १३५० मध्ये त्याने
समाधी घेतली. म्हणजे त्याला ८० वर्षांचे आयुष्य लाभले. त्याचा हा काळ
म्हणजे तेराव्या शतकाचा उत्तरार्ध आणि चौदाव्या शतकाचा पूर्वार्ध.
या काळात यावनी सत्तेने कल्लोळ माजविण्यास प्रारंभ केला होता. परधर्माच्या
आक्रमणाचा तो काळ होता. इ.स. १२९४ मध्ये अल्लाउद्दीन खिलजीची स्वारी
झाली. इ.स. १३०६ मध्ये मलिक कफूरची स्वारी झाली. इ.स. १३४७ मध्ये दक्षिणेस
बहामनी राज्याची स्थापना झाली. या कालावधीत रामदेवराव दिल्लीचा मांडलिक
बनला. स्वराज्य नष्ट झाला होता. यादवांच्या नंतर परधर्मियांची राजवट
सुरु झाली होती. संत मंडळीतील बहुतेक सगळे ज्येष्ठ संत कालवश झाले
होते. उरला होता `संतमेळ्या' तील नामदेव. अशा परिस्थितीत ज्ञानेश्वरांच्या
शिकवणुकीचा प्रसार कीर्तनाव्दारे करण्याचे अखंड कार्य नामदेवाने केले.
` नाचू कीर्तनाचे रंगी । ज्ञानदीप लावू जगी ।' असा संदेश देत नामदेव
सर्वत्र फिरला. कीर्तन परंपरा नारदप्रणित प्रवर्तक मानली जाते. महाराष्ट्रात
या परंपरेचा प्रवर्तक संत नामदेवच आहे. संत ज्ञानेश्वर क्रांतदर्शी
तत्त्वज्ञ,आत्मानुभवी योगी, भूतदयावादी संत आणि प्रतिभासंपन्न कवी
होते. याचबरोबर ते धेयस्वरुप सिध्दपुरुष होते. संत नामदेव हा ध्येयमार्गाने
जाऊ पाहणारा ` पहिला वाट्याडा ' होता. आपल्या भक्तिप्रसार कार्याचा
उत्तराधिकारी म्हणून ज्ञानेश्वरांनी त्याची निवड केली, आणि मग त्यांनी
समाधी घेतली. ज्ञानेश्वरांनी ` ब्रह्मविद्येचा सुकाळ ' केला आणि नामदेवाने
` हरिनामाचा सुकाळ ' केला असे जे म्हटले जाते त्याचा इत्यर्थ हाच की
ज्ञानेश्वरांनी भक्ति तत्त्वज्ञान विशद करुन सांगितले. भक्तिचे
स्वरुप नवविधा आहे.
Next
Page
|